पालघरमधील साधूंच्या हत्याकांड प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करा.
पालघरमधील साधूंच्या हत्याकांड प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करा.





आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची मागणी.

 

सांगली, ता. २३ : पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांचा वाहनचालकांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही आरोपी करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे.

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी याबाबत आज जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे उपस्थित होते. 

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. गेल्या काही दिवसात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. तर हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हव्या असलेल्या आरोपीला राज्याच्या गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लॉक डाऊन च्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉक डाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला. तर पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंच्या हत्याकांड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरील घटनांची निष्पक्ष चौकशी करावी आणि यातील दोषींवर कठोर कारवाई करावी.

निवेदनात म्हटले आहे की, पालघर जिल्ह्यात ता. 16 एप्रिल रोजी दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने पोलिसांसमक्ष काठ्यांनी मारून हत्या केली. या मोब लीचिंग घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेला जबाबदार आरोपींवर कठोर कारवाई करावी. घटनास्थळी उपस्थित असताना व साधूंनी संरक्षणाची याचना केली असतानाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

या घटनेची तीन दिवसांनी समाज माध्यमातून व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत आवाज उठवला. यानंतर राज्यातील महा विकास आघाडी सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार दिवसांनी त्याबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी साधूची हत्या झाल्यानंतर तातडीने स्वतः या घटनेची राज्याला माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची खबरदारी घेणे अपेक्षित होते, मात्र केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शहा यांनी स्वतः चौकशी करेपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठेपर्यंत याबाबत मुख्यमंत्र्यांना जनतेशी बोलावे वाटले नाही याचा निषेध करतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी राज्यात मोब लिंचींगचे असे प्रकार घडले होते, सदर घटना गैरसमजुतीतून घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधूना रोखले असते तर असे घडले नसते अशा सबबी सांगून पोलिसांच्या साक्षीने घडलेले हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. या हत्याकांडावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्ही निषेध करतो.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच ठाणे येथे तरूणाच्या मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.