गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा - अजित पवार.

  • गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा - अजित पवार.

  • प्रशासनाला निर्देश;विकासकामांचाही घेतला आढावा.


बारामती -  बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्‍ठानच्या व्हिआयटी हॉलमध्ये 'कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन' व 'विकास कामांचा आढावा बैठक' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , तालुका कृषि अधिकारी पडवळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.